तुम्हाला सत्तेत पण राहायचे आणि टीकाही करायची या दोन्ही एकत्र कशा होऊ शकतात..?NDA च्या बैठकीत पंतप्रधान मोदी उद्धव ठाकरेंवर बरसले;
गेल्या आठवड्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या खासदारांची बैठक घेत आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील एनडीए खासदारांची बैठक मोदींनी घेतली. या बैठकीत मोदींनी २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचा आहे. त्याचसोबत आगामी निवडणुकीसाठी खासदारांना कानमंत्र दिले. या बैठकीत मोदींनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. भाजपा काँग्रेससारखी अहंकारी नाही असं मोदींनी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी म्हणाले की, ज्या लोकांनी सत्तेत राहून चुकीची कामे केली मी त्याचे तिकीटही कापले आहे. निवडणूक प्रचारात चुकीसाठी माफीही मागितली आहे. काँग्रेस आणि शरद पवारांनी घराणेशाहीत अनेक कर्तृत्वान लोकांना पुढे येता आले नाही. जेव्हा पंतप्रधान बनल्यानंतर मी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी म्हटलं, तुमच्या पक्षाने पहिल्यांदाच पंतप्रधानपदाचा उमेदवार तुम्हाला बनवलं आणि तुमच्या नावावर बहुमत मिळाले असंही त्यांनी सांगितले.
तसेच आम्ही शिवसेनेसोबत युती तोडली नाही तर त्यांनी तोडली. २०१४ पासून शिवसेना युतीत असूनही त्यांचे मुखपत्र सामनातून सरकारवर टीका करत राहिले. आम्ही एकत्रित निवडणूक लढवल्या आणि जिंकल्याही. जे पक्ष एनडीएत सहभागी होतात त्यांचे स्वागत आहे. आम्हाला एनडीएचा विस्तार करायचा आहे. देशाच्या विकासाच्या मार्गावर महाराष्ट्र एक महत्त्वपूर्ण राज्य आहे. सत्तेत असतानाही शिवसेना टीका करायची. विनाकारण वाद उकरून काढायची. आम्ही सर्वकाही सहन केले, कमीपणा घेतला, तुम्हाला सत्तेत पण राहायचे आणि टीकाही करायची या दोन्ही एकत्र कशा होऊ शकतात? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
दरम्यान, बिहारमध्ये संख्याबळ कमी असूनही नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिले. एकनाथ शिंदे आमच्याकडे आले, आम्ही त्यांना मुख्यमंत्री बनवले. आमच्यासाठी मैत्री महत्त्वाची आहे. आम्ही सोबत राहू, सर्वांचा सन्मान करू. भाजपा काँग्रेससारखी अहंकारी नाही त्यामुळे भाजपा सत्तेपासून दूर जाणार नाही असा विश्वासही मोदींनी एनडीए खासदारांच्या बैठकीत व्यक्त केला.
महाराष्ट्र-राजस्थान निवडणूक जिंकणं गरजेचं
देशाच्या समृद्धीसाठी महाराष्ट्र समृद्ध होणे आवश्यक आहे. ३ पक्षांना मिळून काम करायचंय. राजस्थानात कुठल्याही सरकारच्या काळात इतकी वाईट अवस्था नव्हती, जितकी आता आहे. भारताच्या विकासासाठी महाराष्ट्र, राजस्थान निवडणूक जिंकणे गरजेचे आहे. मी वैयक्तिकरित्या घराणेशाहीच्या राजकारणाविरोधात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या विरोधात क्विट इन इंडिया कार्यक्रम चालवा असंही मोदींनी म्हटलं.
Comments
Post a Comment