शिंदेंना एक वर्ष मुख्यमंत्रीपदाचा वायदा होता, आता...; दानवेंचं मोठं विधान
मागील काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यापासून ही चर्चा आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. तसेच अजित पवार केवळ उपमुख्यमंत्री होण्यासाठी सत्तेत गेले नसल्याचा दावा दानवे यांनी केला.
अंबादास दानवे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशी चर्चा आणि दिल्लीतून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेंना एक वर्ष मुख्यमंत्रीपदी राहायचा वायदा होता. एक वर्ष आता संपलं आहे. त्यामुळे आता घरी जावं. हे आम्ही अधिकाऱ्यांकडून, भाजप गोटातून आणि पत्रकारांकडून ऐकत आहोत.
याला पुरक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतली जात आहे. अजित पवार फक्त उपमुख्यमंत्री होण्यासाठी गेले नाहीत. याआधीही ते उपमुख्यमंत्री अनेकदा झाले आहेत, असंही दानवे म्हणाले.
दुसरीकडे अजित पवार यांची चौकशी सुरू आहे. प्रफुल्ल पटेल यांचीही चौकशी सुरू आहे. हसन मुश्रीफ यांना अटक होणार होती. वळसे-पाटील यांचं काय हेही सर्वांना माहित आहे. हे सगळे केवळ चौकशांमुळे गेले आहेत. अन्यथा हे कधीच कारागृहात गेले असते, असा दावा दानवे यांनी केला आहे.
दरम्यान आमदारांच्या निधीवरून दानवे यांनी फडणवीसांनी सभागृहात हिशोब द्यावा, अशी मागणी केली. हिशोब द्यायचा नसेल तर त्यांनी प्रसिद्ध पत्रक काढावं. प्रत्येक आमदाराला किती निधी दिला हिशोब द्यायला हवा, अशी मागणी करताना दानवेंनी इतर आमदारांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचं म्हटलं.
Comments
Post a Comment