अतिवृष्टी व पूरग्रस्तांना मिळणार मोफत अन्नधान्य..

 गत काही दिवसापासून राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टी व महापुराचे थैमान सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे निराधार झालेल्या कुटुंबांना शासनाच्या आदेशानुसार मोफत अन्नधान्य व केरोसीनचा लाभ मिळणार आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवू निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ व ५ लिटर केरोसीन मोफत पुरविण्यास महसूल व वन विभागाच्या ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

त्याअनुषंगाने या विभागाच्या ७ ऑगस्‍ट २०१९ च्या परिपत्रकान्वये अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थितीत अन्नधान्य वाटपाकरिता कार्यपद्धतीबाबत सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.महसूल यंत्रणेने पात्र ठरविलेल्या कुटुंबांनाच सदर अन्नधान्याचे वितरण करावयाचे आहे. त्यादृष्टीने महसूल यंत्रणेशी समन्वय साधून त्यांच्याकडून पात्र बाधित कुटुंबांच्या प्राप्त झालेल्या यादीनुसार प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ व ५ लिटर केरोसिन मोफत वितरण तत्काळ करण्यात यावे असेही आदेशात म्हटले आहे.

संबंधित जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नवितरण अधिकारी, उपनियंत्रक शिधावाटप अधिकारी यांनी त्यांच्याकडे लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिल्लक असलेल्या अन्नधान्यामधून आवश्यक अन्नधान्याचे वितरण करण्याचे आदेश असून, पूरग्रस्तांना वाटप केलेल्या अन्नधान्याची माहिती वेळोवेळी शासनास सादर करावी अशाही सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Comments