जितेंद्र आव्हाडांचा अजूनही विरोधी पक्षनेतेपदावर दावा! म्हणाले, "आमच्याकडे ४५ आमदार"
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटल्यामुळे विरोधी पक्षनेता कुणाचा, अशी चर्चा विरोधकांमध्ये सुरू आहे. राष्ट्रवादीतील अनेक आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. आता सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आला आहे. त्यामुळे काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असेल का?, अशी चर्चा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. आमदार त्यांचे जास्त आहेत कशावरून? आमच्याकडे आमचे ४५ आमदार आहेत.आम्ही त्यांचं पत्र पाठवत आहोत, असे आव्हाड म्हणाले.
अजित पवार खातेवाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. यावर देखील आव्हाड यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आव्हाड म्हणाले, अजित पवारांची भूमिका त्यांना लखलाभ, आम्ही बोलणार नाही. त्यांनाही दिल्लीची सवय पडेल. इथे बसल्या हाताने गोष्टी करायची सवय होती. आता ही सवय बदलेल.दिल्लीत शिवाजी महाराज यांना ५ हजारांची मनसबदारी जाहीर केली होती. मात्र त्यांनी सगळं लाथाडलं आणि स्वाभिमान जपला. आत्ताचे नेते जपतात का बघू, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
जयंत पाटलांची भूमिका वेगळी -
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. संख्याबळाचा विचार केला तर काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होईल असं मला वाटतं, संख्याबळ आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे विधीमंडळातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस असेल, असे जयंत पाटील म्हणाले.
Comments
Post a Comment