'२ ते ३ दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाहीत', इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर गिरीश महाजनांची घटनास्थळावरुन धक्कादायक माहिती
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातल्या खालापूरजवळच्या इर्शालवाडी गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शालवाडी गावावर दरड कोसळली आहे. संपूर्ण गाव रात्री झोपेत असताना अचानक ही दुर्घटना घडली. या घटनेमध्ये संपूर्ण गाव जमीनदोस्त झालं आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अशामध्ये घटनास्थळी उपस्थित असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी धक्कादायक माहिती सांगितली आहे. '२ दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाहीत.', असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, 'बचावकार्य सुरु असून मुसळधार पाऊस असल्यामुळे अडचणी येत आहेत. मी रात्री तीन वाजल्यापासून वरती आहे. माती घरांवर कोसळ्याने ती दबली आहेत. इथे येण्याचा मार्गही कठीण आहे. पाऊस जोरात असल्याने काम करणं शक्यच नाही.आतापर्यंत सहा मृतदेह मिळाले आहेत. मातीचा ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढणं फार कठीण काम आहे. या गावाची लोकसंख्या 250 आहे. त्यातील 70 ते 80 लोकांची माहिती मिळाली आहे.'
गिरीश महाजनांनी पुढे सांगितले की,'या दुर्घटनेमध्ये बचावलेल्यांचा आकडा किती असेल हे सांगणे कठीण आहे. नातेवाईकांकडे चौकशी सुरु आहे. ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढणंसुद्धा कठीण आहे. दोन ते तीन दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाहीत. कारण मातीचा ढिगारा घरांवर येऊन पडला आहे. पाऊसही थांबत नाहीये. इथे हेलिकॉप्टर येणे देखील शक्य नाही.' अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे.
इर्शालवाडी गावावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. क्षणात संपूर्ण गाव गुडूप झाले आहे. हे गाव खालापूरच्या इर्शालगडावरील चौकापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. डोंगर भागात असलेल्या मोरबे धरणाच्या वरच्या भागात ही आदिवासींची वाडी वसलेली आहे.जुन्या मुंबई-पुणे महामार्गाजवळच ही इर्शालवाडी आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावासामुळे ही दुर्घटना घडली आहे. या गावामध्ये जवळपास ४० ते ५० घरं होती. ही सर्व घरं दरडीखाली दबली गेली आहेत.
या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये बचाव पथकातील एकाचा देखील समावेश आहे. तर १०० पेक्षा अधिक जण मलब्याखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एनडीआरएफ (NDRF) आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरु आहे. पण मुसळधार पाऊस आणि दुर्गम भाग असल्याने मदतकार्यात अनेक अडथळे येत आहेत.
Comments
Post a Comment