"जीवनशैलीची एैशी तैशी, पण अपार सहनशीलता"; लोकल प्रवासातील आ.तांबेंचा अनुभव
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे हे विधानभवनात जाण्यासाठी रस्तामार्गाने प्रवास करत होते. भिवंडीजवळ वाहतूक कोंडीत ते अडकले, कसेबसे कल्याण गाठले.मात्र मुंबई पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी लोकलने प्रवास केला.
सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. सत्यजीत तांबे यांनी या अधिवेशनात विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. सोमवारीही ते संगमनेरहून अधिवेशनासाठी गाडीने निघाले होते. मात्र नाशिक-मुंबई हायवेवर भिवंडीजवळ ते तीन ते चार तास वाहतूक कोंडीत अडकले. त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात की, शेवटी मित्राने कल्याणवरून लोकल ट्रेनने मुंबई गाठण्याचा सल्ला दिला. मात्र, भिवंडी बायपासवरून कल्याणपर्यंतचे ३० मिनिटांचे अंतर कापायलाही त्यांना तीन तास लागले. शेवटी कल्याणवरून त्यांना एसी लोकल मिळाली.
या एसी लोकलमध्ये बसल्यावर त्यांनी स्वत:चा फोटो काढत ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी #शहर_विकास हा हॅशटॅग वापरत मुंबईकरांबद्दल प्रचंड आदर व्यक्त केला. ते म्हणतात, मुंबई महानगर प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या पालघरपासून पनवेलपर्यंत आणि कल्याण-डोंबिवलीपासून मुंबईपर्यंत सर्व जनतेविषयी आज माझ्या मनातील आदर प्रचंड वाढला. ही जनता किती सहनशील आहे!असे ते म्हणाले.
त्यापुढे त्यांनी राज्याच्या राजधानीभोवती असलेल्या पायाभूत सुविधांबाबतही प्रश्नचिह्न उपस्थित केलं. मुंबईच्या अवतीभवती पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. माणसांच्या जीवनशैलीची ऐशी-तैशी झाली आहे. तरीही लोकांची सहनशीलता कायम आहे, असंही ते ट्वीटमध्ये म्हणाले.
आ. सत्यजीत तांबे यांच्या या ट्वीटवर लोकांनीही मनापासून प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वसामान्यांच्या जीवनातील अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल एका युजरने आ. तांबे यांचं अभिनंदन केलं. तसंच त्यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडावा, अशी विनंतीही केली. आणखी एक युजरने 'तरी बरे, लोकलमध्ये अडकला नाहीत. नाहीतर मुंबईकरांच्या संयमाची परीक्षाही तुम्हाला देता आली असती', असं मत मांडलं.
Comments
Post a Comment