शरद पवार म्हणाले होते, बैल म्हातारा झालाय; कोल्हापूरकरांनी ठरवलं, अन्...
मंडलिक यांचा सासने मैदानात अमृतमहोत्सवी सत्कारही पवार यांच्याच हस्ते झाला आणि तेथून परत जाताना दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून पवार यांनी संभाजीराजे यांची उमेदवारी निश्चित केली. त्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार धनंजय महाडिक यांना राजकीय दबाव वापरून गप्प बसवण्यात आले. तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांनी महाडिक यांची समजूत काढताना पुरेवाट झाली होती. संभाजीराजे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि आता फक्त गुलालच लावायचा बाकी राहिलाय, निवडणूकसुद्धा घ्यायची गरज नाही अशीच हवा तयार झाली. झाडून सारे नेते त्यांच्या मागे होते. मंडलिक यांना तुम्ही लढू नका म्हणून सांगायला गेलेल्या लोकांना ते शिव्या देऊन हाकलून देत होते. शेवटी माझे एक मत तरी मला पडेल की नाही असा त्यांचा पवित्रा. अखेर त्यांनी शड्डू ठोकलाच. वातावरण चांगलेच तापले. त्यातच पवार यांची कोल्हापुरातील महाराणा प्रताप चौकात जाहीर सभा झाली. त्यामध्ये त्यांनी या म्हाताऱ्या बैलास आता घरी बसवा असे आवाहन केले; परंतु तिथेच त्यांचा पाय खोलात गेला. कृषी संस्कृतीत बैल म्हातारा झाला म्हणून शेतकरी त्याला कधी वाऱ्यावर सोडत नाही. त्याची जपणूक करतो. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेने या म्हाताऱ्या बैलास डोक्यावर घेतले आणि पवार यांनी दिलेल्या तरण्याबांड संभाजीराजे यांना पराभूत केले. ही निवडणूक मंडलिक विरुद्ध संभाजीराजे अशी कागदावर झाली तरी प्रत्यक्षात लोकांनी तिला मंडलिक विरुद्ध पवार असेच स्वरूप दिले. आता अजित पवार यांनी शरद पवार यांचे वय काढले आहे. आता या म्हाताऱ्या बैलाला महाराष्ट्राची जनता डोक्यावर घेते की घरी बसवते याचीच उत्सुकता आहे.
जनमानस महत्त्वाचे.. मंडलिक यांची ही लढत देशपातळीवर गाजली. या वयातही त्यांची लढाऊवृत्ती लोकांना भावली. सत्ता, संपत्ती, नेते सगळे पाठीशी असतानाही संभाजीराजे निवडून येऊ शकले नाहीत. कारण लोकांनी कुणाला विजयी करायचे यापेक्षा कुणाला पाडायचे हे अगोदरच ठरवले होते. कोल्हापुरातून मंडलिक व हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची गट्टी जमली आणि त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी दिली.
Comments
Post a Comment